

संकल्पना
आजकालच्या आधुनिक जगात आजच्या गरजांपुढे पाऊल ठेऊन बहुतांश लोक नोकरी निमित्य शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. शहरातील शेकडो रहिवास्यांची आजही शेतीशी नाळ जुळलेली आहे. परंतु नोकरीच्या व्यापात फक्त सणावाराला किंवा लग्नकार्याला गावाकडे जाणं होतं पण तिथे निवांतपणे राहणं होत नाही. मोठ्यांचीच हि अवस्था आहे मग लहान मुलाबाळांच काय? ते फक्त गाव पाहतात मात्र अनुभवत नाहीत. आणि ज्यांना गाव व शेती नाहीच त्यांचं काय?
शेतातलं घर, शेतातील निरव शांतता, निसर्गरम्य वातावरणातील निवांतपणा, निसर्गाचं लोभसवाणं रूप आणि विविध छटा, रात्रीच्या गडद्ध अंधारातील असंख्य तारकांचा विलोभनीय प्रकाश, पहाटेच्या उबदार गारव्यात निरनिराळ्या पक्ष्यांचा चिवचिवाट, हि जणू कल्पनाच वाटते.
पण हे सत्य आहे.
शेतातील घरापुढचं-मागचं अंगण, अंगणातील ताज्या भाज्या आणि चुलीवरच्या भाकऱ्या, चुलीवर तापवलेल्या गरमागरम पाण्यातील आंघोळ, झाडाखाली खाटेवर विश्रांती घेत केलेलं पुस्तक वाचन, पत्ते खेळणे, वावरामध्ये मुक्तपणे भटकण्याचा अनोखा आनंद, हवेच्या तालावर नाचणाऱ्या विविधरंगी फुलांचा बगीचा, त्यावर बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं, या सर्व गोष्टी खरंतर अनुभवायला मिळणं आजकाल दुर्लभच.
आजच्या धकाधकीच्या जीवनात या सर्व गोष्टी मागे पडल्या आहेत, खरंतर हरवल्या आहेत.
म्हणूनच, या हरवलेल्या सर्व गोष्टी एकत्र आणून, बालपणीच्या आठवणींना उजाळा देता यावा आणि त्यात रममाण होता यावे म्हणून कृषिपर्यटनाचा हा एक प्रयत्न. या सर्व गावाकडच्या मागे पडलेल्या गोष्टी आपणाला इथे गवसणार आहेत आणि त्या गोष्टींचा असाच्या असा आस्वाद आपणाला घेता येणार आहे.
काही मुक्त क्षण अनुभवण्यासाठी, शेतकऱ्यांचे शेतजीवन पाहण्यासाठी, ग्रामीण संस्कृतीची ओळख वाढवण्यासाठी, मित्रपरिवार किंवा आप्तस्वकियांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, कंपनीच्या धेय्य-धोरणांवर विचार-विमर्श करण्यासाठी, या न अशा बहुविध कारणांसाठी आपण KMT फार्म्सला भेट देऊ शकता.

